पिके सुकू लागली; राजेगांव सह परिसरातील शेतकरी हवालदिल
राजेगांव:- जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसाने माजलगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या.
राजेगांव सह परिसरातील शेतकऱ्यांनीही या पावसाच्या जीवावर पेरणी केली होती. जुन महिन्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु आता गत आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे उगवून आलेली पिके पाऊस नसल्याने सुकू लागली आहेत.
राजेगांव सह परिसरात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकाची लागवड व पेरणी पूर्ण केली. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या दुष्ट चक्रामध्ये शेतकरी अडकलेला पाहिलेला आहे. यावर्षी तरी निसर्ग आपली अवकृपा दाखवणार नाही अशी त्यांना आशा आहे. मात्र गत आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने पिके सुकू लागली आहेत. सध्या ऊन-सावलीचा खेळ अन् सुसाट्याचा वारा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काळीज फाटत आहे. गत आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कोमेजलेली पिके सुकू लागली आहे. यामुळे राजेगांव सह परिसरातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची टांगती तलवार डोक्यावर आहे.
चौकट:-
दोन तीन दिवसांपासून नुसते वारे वाहू लागले आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात पावसाचे ढग नसले तरी चिंतेचे ढग मात्र कायमच असतात.
ही वेबसाईट कुठली शासकीय नाही. ही वेबसाईट स्वतंत्र मालकीची आहे.